
0 Bookmarks 3437 Reads0 Likes
वामांगी
देवळात गेलो होतो मधे
तिथ विठ्ठल काही दिसेना
रखमाय शेजारी
नुसती वीट
मी म्हणालो ऱ्हायल
रखमाय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोक ठेवायच
पायावर ठेवलेल डोक
काढून घेतल
आपल्यालाच पुढ माग
लागेल म्हणून
आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठ गेला
दिसत नाही
रख्माय म्हणाली
कुठ गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला
मी परत पाह्यल
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथ
कोणीही नाही
म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूच मला जरा
कमीच दिसत
दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकड जरा
होत नाही
कधी येतो कधी जातो
कुठ जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही
खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले
आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कस कुणी
सांगितल नाही
आज एकदमच मला
भेटायला धावून आल
अठ्ठावीस युगांच
एकटेपण
No posts
No posts
No posts
No posts
Comments